अपरिपूर्णता सुंदर असते.


जीवनाचा स्थायी भाव हा नित्य पुढे जात रहाणं असाच असतो. काळाचे मार्गक्रमण निरंतर सुरु  असते आणि मनुष्य जीवनातील घटना एक एक करुन मागे पडत असतात.  कोणी प्रयत्नपुर्वक इच्छीत ध्येय साध्य करतो, तर कुणाच्या जीवनात खुप प्रयत्न करुनही  रितेपणा कायम रहातो.  भगीरथ प्रयत्न करुन एखादया मनुष्याने ठरवलेले ध्येय साध्य केले तरी प्रश्न उरतो आता पुढे काय ? याही पेक्षा मोठ काही  मिळवावं कि चित्ती असु दयावे समाधान… प्रश्न कायम रहातो.
आज जे आपणास परिपूर्ण  वाटतयं ते उदया तसं वाटेलच अस काही नाही. एकुणच एक गोष्ट नक्की की मनुष्यजीवन हे अपूर्णतेकडे झुकलेले असते. आणि ही अपूर्णता/अपरिपूर्णताच ख-या अर्थाने मानवास जीवन जगण्यास प्रवृत्त करत असते.  जगण्याचे आकर्षण मुळात  परिपुर्णतेत/पुर्णत्वात नाही,  तर ते अपूर्णतेत असते.  एखादया  शिल्पातील थोडीशी अपूर्णता,  त्या ‍ शिल्पास मानवी भावनांनी जिवंत ठेवते. अपूर्णता, रितेपणा हया भावना मानवी आयुष्याला 
अधिक सुदंर बनवतात. अपूर्णता ‍स्वीकारायचं धैर्यच मनुष्याला जीवन जगण्याकरीता बळ देत असते.
 जीवन हे बहुआयामी असल्याने त्याला अनेक पैलु असतात त्यामुळे  परिपूर्णतेचा अट्टाहास धरणं हे फार संयुक्तीक होऊ शकत नाही. परिपूर्णता हि निरपेक्ष संकल्पना नसुन ती व्यक्ती/काळ/परिस्थीती सापेक्ष असते.  जसं एखादया व्यक्तीकरीता ‍ परिपूर्णतेचे मानक हे तरुणपणी यश, प्रौढावस्थेत स्थैर्य व नंतरच्या काळात शांती असे असु शकतात तर दुस-या व्यक्तीसाठी ही मानके सत्ता, संपत्ती,  प्रतिष्ठा या स्वरूपाची असतील.  अपरिपूर्णता ही जीवनाची वास्तव अवस्था आहे.  ब-याचदा एखादी गोष्ट प्राप्त करुन घेण्यापेक्षा ती अधुरी रहाण्यात अथवा  न ‍मिळण्यातच जीवनाची धन्यता असते.  त्यामुळे ठराविक गोष्ट प्राप्त करण्यासाठी कालापव्यय करुन आयुष्यातील ठरलेले टप्पे पुढे ढकलत रहाण हे देखील तर्काला धरुन नाही.   
अपरिपूर्णतेसह मार्गक्रमण करीत रहाणं, धर-सोड दृष्टीकोन बाळगणं, चांगल्या वाईट अनुभवातुन जीवन पुढे नेत रहाणे ही जिवंतपणा असल्याची अनुभूती आहे.

Comments